Homeशैक्षणिक - उद्योग मानवी विचारशक्तीला तंत्रज्ञान हा पर्याय नाही : प्रा. पर्सी इंजिनिअर

मानवी विचारशक्तीला तंत्रज्ञान हा पर्याय नाही : प्रा. पर्सी इंजिनिअर

• ‘रिसेंट ट्रेंड्स इन इंजिनिअरिंग’ आंतरराष्ट्रीय परिषदेचा शुभारंभ
कोल्हापूर :
तंत्रज्ञानामुळे कार्यक्षमता वाढते; मात्र मानवी मेंदूची म्हणजेच विचार करण्याची क्षमतेची जागा तंत्रज्ञान कधीही घेऊ शकत नाही, असे प्रतिपादन सार्वजनिक विद्यापीठ, सुरतचे माजी प्रो-व्होस्ट प्रा. पर्सी इंजिनिअर यांनी केले. कृत्रिम बुद्धिमत्ता हे आधुनिक आणि प्रभावी तंत्रज्ञान असले तरी ते केवळ एक साधन असून त्याचा वापर विचारपूर्वक आणि जबाबदारीने करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन रिसेंट ट्रेंड्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. सयाजी हॉटेलच्या मेघमल्हार सभागृहात या परिषदेचे उदघाटन झाले. यावेळी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू तथा डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, युनायटेड किंगडममधील टीसाईड युनिव्हर्सिटी प्रा. मायकेल शॉर्ट, पब्लिक युनिवर्सिटी मलेशियाच्या डॉ. कलावानी चेल्लप्पन, टेक्नो इंटरनॅशनल न्यू टाऊन, कोलकाताचे प्रा. निलांजन डे यांच्यासह डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, समन्वयक डॉ. मनीषा भानुसे आदी उपस्थित होते. या परिषदेत देश- विदेशातून ५५३ रिसर्च पेपर सबमिट झाले होते. त्यातील १७५ रिसर्च पेपर या परिषदेत मांडले जाणार आहेत.
प्रा. पर्सी इंजिनिअर पुढे म्हणाले की, अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रत्येक व्यक्ती ही सतत शिकत असते. काळानुसार, समाजाच्या गरजेनुसार आणि तांत्रिक प्रगतीनुसार अभियांत्रिकीतील ट्रेंड्स बदलत राहतात. ए. आय. स्वतःहून स्वतंत्र विचार करू शकत नाही; त्यामुळे मानवी सर्जनशीलता, निर्णयक्षमता आणि नैतिक मूल्ये केंद्रस्थानी ठेवूनच तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. ए.के. गुप्ता म्हणाले, संशोधन हा अभियांत्रिकी क्षेत्राचा पाया आहे. विद्यापीठ अनुदान आयोग व अन्य प्राधिकरणाच्या नियमांमुळे संशोधन पेपर्स प्रसिद्ध करण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढते संशोधन हे कौतुकास्पद आहे. मात्र हे संशोधन केवळ शोधनिबंध अथवा प्रयोगशाळेत पुरतेच मर्यादित राहू नये. आपण केलेल्या संशोधनाचा फायदा समाजाला झाला, त्यामुळे जीवनमान उंचावले तरच ते अभियांत्रिकी आणि संशोधक यांचे खरे यश ठरेल.
प्रा. मायकेल शॉर्ट यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाश्वत अभियांत्रिकीतील नवकल्पना या विषयावर मार्गदर्शन करताना पर्यावरणपूरक व टिकाऊ तंत्रज्ञानाच्या विकासावर भर दिला.
प्रा. निलांजन डे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग अभियांत्रिकी शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी कसा करता येईल, यावर प्रकाश टाकला. ए. आय. मुळे निर्णयप्रक्रिया अधिक वेगवान व अचूक होऊ शकते. मात्र मानवी सर्जनशीलता आणि नैतिक मूल्ये केंद्रस्थानी ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
डॉ. राधिका ढणाल व प्रा. तिलोत्तमा पाडळे यांनी सूत्रसंचालन केले. या परिषदेला विविध विद्यापीठे, महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र कुलपती ऋतुराज पाटील, विश्वस्त आणि शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
37 ° C
37 °
37 °
26 %
3.6kmh
89 %
Tue
33 °
Wed
29 °
Thu
30 °
Fri
30 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page