Homeराजकियकौस्तुभ गावडे यांना विधानपरिषदेमध्ये पाठविण्याचा शिक्षकांनी केला ठाम निर्धार

कौस्तुभ गावडे यांना विधानपरिषदेमध्ये पाठविण्याचा शिक्षकांनी केला ठाम निर्धार

• श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कोल्हापूर जिल्हा शिक्षकांचा मेळावा उत्साहात
कोल्हापूर :
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर विभागाच्या वतीने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेला ‘कोल्हापूर जिल्हा शिक्षकांचा निर्धार मेळावा’ अत्यंत उत्साहात पार पडला. आगामी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत कौस्तुभ गावडे यांच्या विजयाची पताका फडकवण्यासाठी सर्व शिक्षकांनी संघटित होऊन काम करण्याचा ठाम निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.
या मेळाव्यात बोलताना मान्यवरांनी स्पष्ट केले की, यापूर्वी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने तीन वेळा पुणे विभागाचा शिक्षक आमदार निवडून दिला आहे. या प्रत्येकवेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील शिक्षकांची नेहमीच मोलाची साथ लाभली आहे. याच विश्वासाच्या जोरावर आणि गुरुदेव कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांच्या बळावर आगामी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत निश्चितपणे ऐतिहासिक विजय संपादन करण्याचा निर्धार करुन प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या मेळाव्यामध्ये संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या कोल्हापूर विभागाचे प्रमुख डॉ. श्रीराम साळुंखे, संस्थेचे आजीव सेवक व कोल्हापूर जिल्हा प्रचार प्रमुख भूपाल कुंभार, श्रीमती ए. आर. पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजीच्या प्राचार्या डॉ. श्रुती जोशी, सातारा जिल्हा विभागप्रमुख शशिकांत काटे, आजीव सेवक अजितकुमार देसाई, प्राचार्य पी. एस. चव्हाण, आर. डी. पाटील, विरेन भिर्डी, हुसैन पठाण या मान्यवरांनी आपल्या मनागेतामधून, कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी सर्व शिक्षकांनी जीवाचे रान करुन विक्रमी शिक्षक मतदार नोंदणी केली आहे. या कामगिरीच्या जोरावर आपला विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन केले.
यावेळी शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे यांनी, सन 2005 अगोदरच्या सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना विनाअट जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी व्यापक काम सुरु असून शिक्षकांना सेवानिवृत्त झाल्यानंतर सन्मानाने जीवन जगण्यासाठी जुनी पेन्शन योजना़ मिळवणे हे प्रमुख ध्येय आहे.  शिक्षकांच्यावर लादली जाणारी अशैक्षणिक कामे रद्द करण्यासाठी विधानपरिषदेमध्ये शिक्षकांच्या हक्काचा कर्तबगार सदस्य जाणे गरजेचे आहे.  दीर्घकाळ सेवा बजावलेल्या शिक्षकांच्या सेवा सुरक्षेला बाधा न आणता टीईटी सक्ती रद्द करावी, आवश्यक प्रशिक्षण आणि उपाययोजना यासाठी प्रयत्न करणे, पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रिया वर्षभर नियमितपणे सुरू राहण्यासाठी पाठपुरावा करणे, जेणेकरून विविध कारणांमुळे रिक्त झालेली शिक्षक पदे वेळेत भरली जातील आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल.  शिक्षण क्षेत्राला भ्रष्टाचारापासून मुक्त करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आणि आवश्यक विषय शिक्षकांची नियुक्ती यासाठी प्रभावी पाठपुरावा करणे, विशेषतः गणित, विज्ञान, इंग्रजी, संगणक, कला, क्रीडा आणि व्यावसायिक विषयांतील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यावर भर देणे, अनुदानास पात्र संस्था व वाढीव तुकड्यांना वेळेत अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा करणे इत्यादी मुद्यांसह शिक्षकांचे सर्व प्रलंबीत प्रश्न पुढील सहा वर्षात सोडविण्यासाठी सर्व शिक्षक माझ्या पाठीशी ठाम उभे असल्यामुळे आपला विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन केले.
या निर्धार मेळाव्याला कोल्हापूर जिल्ह्यातील ३० शाखांमधील हजारो शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
78 %
5.1kmh
77 %
Fri
29 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page