Homeइतरजिल्ह्यातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहता कामा नये : आ. राजेश क्षीरसागर

जिल्ह्यातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहता कामा नये : आ. राजेश क्षीरसागर

• शाळा, महाविद्यालयीन प्रवेशाबाबत शिक्षण विभागाची आढावा बैठक
कोल्हापूर :
राज्य शासनाच्या निर्देशानुसार सुरु असणारी प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची आणि कोणत्याही विद्यार्थी व पालकाची फसवणूक, लुट होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाची आहे. अतिरिक्त फी, डोनेशन, बिल्डींग फंड, शालेय साहित्यांच्या माध्यमातून पालकांची होणारी लुट खपवून घेतली जाणार नाही. आर.टी.ए. मधून प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांवर कोणताही दुजाभाव होवू नये, पी.टी.ए.चे नियम डावलून मनमानी फी वाढ झाल्यास तात्काळ कारवाई करा. कोणाचीही मुलाहिजा न बाळगता विनाडोनेशन पारदर्शी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा, जिल्ह्यातील एकही विद्यार्थी शालेय, महाविद्यालयीन प्रवेशापासून वंचित राहता कामा नये, अशा सक्त सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
शाळा व महाविद्यालयीन प्रवेशाबाबत शिक्षण विभागाची शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीच्या सुरवातीस शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी शालेय आणि ११ वी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचा आढावा आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासमोर सादर केला.
यानंतर बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, शिक्षण सम्राटांच्या मनमानी कारभाराविरोधात गेली २० वर्षे शिवसेना, युवासेना लढा देत आहे. शिक्षण विभागाशी बैठक घेवून पालकांची लुट थांबविण्याच्या सूचना करते. परंतु, काही ठराविक शिक्षण संस्था मनमानी कारभार करत असल्याचे वारंवार निदर्शनास येवूनही शिक्षण विभाग त्यांच्यावर कारवाई करत नसल्याने दिसून येते. अजूनही काही खाजगी शाळांचा मनमानी कारभार सुरूच आहे. काही शिक्षणसम्राटांनी व्यवसाय करण्यासाठीच शाळा उघडल्या आहेत. शिक्षणसम्राटांकडून चाललेली लुट थांबविण्यासाठी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शाळांचा दर्जा सुधारावा. खाजगी शाळांमध्ये नियुक्त असलेली पीटीए समितीवर शिक्षण संस्थेच्या मर्जीतील पालकांचा समावेश असल्याने खासगी शाळांचा मनमानी कारभार वाढला असल्याने मनमानी फी आकारली जाते, अशा शिक्षण संस्थांवर तात्काळ कारवाई करावी. यासह शालेय फी न भरल्याने विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्याचे प्रकार यापूर्वी घडले असून, असे प्रकार घडू नयेत अशा सक्त सूचना शाळांना द्याव्यात.
आर.टी.ए.च्या राखीव कोट्यातून प्रवेश झालेल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत दुजाभाव केल्याच्या तक्रारी होतात. याकडे कटाक्षाने लक्ष देवून, संबधीत विद्यार्थ्याबाबतीत दुजाभाव करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करा, अशा सूचना देत दरवर्षी प्रमाणे शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत शिक्षण संस्था चालक, प्रशासन यांची या आठवडाभरात संयुक्तिक बैठक आयोजित करावी, अशा सूचना दिल्या.
शालेय अतिरिक्त फी, डोनेशन, बिल्डींग फंड, शालेय साहित्यांच्या माध्यमातून पालकांची होणारी लुट तसेच  महाविद्यालयीन ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट, कागदपत्रे पडताळणी किंवा प्रवेश निश्चित करताना कोणतीही तक्रार अथवा समस्या आल्यास त्यांनी शिवसेना आणि युवासेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
या बैठकीस शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव पी.एस.पांडव, विभागीय सह संचालक श्री. बच्छाव, शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर, सहाय्यक संचालक गणपती कमळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, शिवसेना नगरसेवक प्रसाद चव्हाण, शिवसेना उपशहरप्रमुख अंकुश निपाणीकर, युवासेना जिल्हाप्रमुख चेतन शिंदे, शहरप्रमुख मंदार पाटील, शैलेश साळोखे, कपिल पोवार, सौरभ कुलकर्णी, शुभम शिंदे, रघुनंदन भावे, अमोल नवले, युवतीसेनेच्या नम्रता भोसले, निवेदिता तोरस्कर आदींसह युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
31.2 ° C
31.2 °
31.2 °
62 %
5kmh
1 %
Mon
31 °
Tue
32 °
Wed
31 °
Thu
31 °
Fri
30 °

Most Popular

You cannot copy content of this page