Homeसामाजिक‘नशामुक्त कोल्हापूर’साठी प्रत्येक जिल्हावासीयाने सहभाग घ्यावा : जिल्हाधिकारी

‘नशामुक्त कोल्हापूर’साठी प्रत्येक जिल्हावासीयाने सहभाग घ्यावा : जिल्हाधिकारी

• जिल्ह्यात २९ सप्टेंबरपर्यंत नशामुक्ती प्रबोधन पंधरवडा
कोल्हापूर :
जिल्ह्यात नशामुक्तीचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी आणि समाजात जनजागृती करण्यासाठी २९ सप्टेंबरपर्यंत नशामुक्ती प्रबोधन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नशामुक्त कोल्हापूर’ हा नारा देत प्रत्येक जिल्हावासीयाने या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. या पंधरवड्याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली, ज्यात विविध जनजागृती कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीत नशामुक्तीचा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे सविस्तर नियोजन करण्यात आले. समाजातील तरुण पिढी आणि सर्वसामान्य नागरिकांना व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करणे आणि नशामुक्त जीवनशैलीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी नशामुक्ती शपथ, प्रबोधनात्मक व्याख्याने, नशामुक्त रन, सायकल रॅली, समुपदेशन शिबिरे, प्रभात फेरी, पथनाट्ये आणि महाविद्यालय स्तरावरील विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नशामुक्ती शपथ घेतली जाईल, ज्यामुळे नागरिकांमध्ये नशामुक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचेल. तज्ज्ञ व्यक्तींकडून व्यसनाच्या दुष्परिणामांबाबत व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. तरुणांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि नशामुक्तीचा संदेश देण्यासाठी नशामुक्त रन आणि सायकल रॅलीचे आयोजन होणार आहे. याशिवाय, व्यसनाधीन व्यक्तींसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी समुपदेशन शिबिरांचे आयोजन केले जाईल. गावोगावी आणि शहरांमध्ये प्रभात फेरी आणि पथनाट्यांद्वारे नशामुक्तीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला जाईल.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या उपक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करताना म्हटले की, नशामुक्त कोल्हापूर ही केवळ संकल्पना नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. विशेषतः तरुणांनी या मोहिमेत पुढाकार घ्यावा. त्यांनी शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आणि स्थानिक प्रशासनाला या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे नशेच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तींना व्यसनमुक्तीचा मार्ग दाखवण्याबरोबरच तरुण पिढीला व्यसनांपासून दूर राहण्यासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीला सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे, पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुवर्णा सावंत, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, कपिल जगताप, अशोक पवार, कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे प्रकुल पाटील मांगोरे, अमोल आळवेकर, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
29 °
79 %
3.1kmh
11 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page