Homeराजकियस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा
• राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचना
कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, अपर जिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीबाबत सविस्तर माहिती सादर केली. यामध्ये मतदार संख्या, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम), मतदान केंद्रांची व्यवस्था आणि इतर अनुषंगिक तयारी यांचा समावेश होता. त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाची माहितीही आयुक्तांना दिली. यावेळी त्यांनी प्रभाग रचनेचे वेळापत्रक, मतदान केंद्रांची रचना आणि निवडणूक प्रक्रियेच्या तयारीबाबत सादरीकरण केले.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रभाग रचना वेळापत्रकानुसार योग्य पद्धतीने राबविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यांनी मतदान केंद्रांची निश्चिती करताना सर्व सुविधांची पडताळणी करण्याचे आणि आवश्यक दुरुस्त्या तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मतदान केंद्रांवर पाणी, वीज, स्वच्छतागृहे यासारख्या मूलभूत सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
तसेच, निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रशिक्षण देण्याचे आदेशही त्यांनी दिले. प्रशिक्षणामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होईल, असे त्यांनी नमूद केले.
बैठकीनंतर आयुक्त वाघमारे यांनी करवीर तहसील कार्यालयात राज्य निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूमला भेट दिली. यावेळी त्यांनी ईव्हीएमच्या सुरक्षिततेची आणि व्यवस्थापनाची पाहणी केली. स्ट्राँग रूममधील व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणेची पडताळणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले.
राज्य निवडणूक आयुक्तांनी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकशाहीचा पाया मजबूत करणाऱ्या असून, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
31 ° C
31 °
29.9 °
66 %
3.1kmh
12 %
Wed
30 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page