• कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे येथे सेंद्रिय शेती प्रशिक्षण संपन्न
कोल्हापूर :
जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण सातत्याने घटत चालल्यामुळे शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होत असून, सेंद्रिय शेतीचा अवलंब करूनच जमिनीचे आरोग्य सुधारता येईल, असे प्रतिपादन आत्मा, कोल्हापूरचे प्रकल्प उपसंचालक रविंद्र तागड यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे येथे आयोजित दोन दिवसीय सेंद्रिय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
परंपरागत कृषी विकास योजना २०२५-२०२६ अंतर्गत कृषी विभाग, आत्मा, कोल्हापूर व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमात पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील ५४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.
कृषी विज्ञान केंद्र, तळसंदेचे प्रमुख, वरिष्ठ शास्त्रज्ञ जयवंत जगताप यांनी प्रास्ताविक केले. कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या सेंद्रिय शेती व कृषी संलग्न व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसोबतच उद्योजकतेच्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. दीपक पाटील यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व, फायदे व बाजारातील संधी यावर मार्गदर्शन केले. डॉ. शांतीकुमार पाटील यांनी सेंद्रिय शेतीची तत्त्वे, निविष्ठा व मर्यादा स्पष्ट करत शेतात उपलब्ध पाला-पाचोळ्यापासून दशपर्णी अर्क तयार करण्याची माहिती दिली. सेंद्रिय गटांचे शेतकरी उत्पादक कंपनीत रूपांतर कसे करावे, यावर प्रा. राजवर्धन सावंत भोसले यांनी मार्गदर्शन केले. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे महत्त्व, गांडूळ व सूक्ष्मजीवांची भूमिका तसेच संतुलित पीक पोषण याबाबत डॉ. निनाद वाघ यांनी सखोल माहिती दिली. किड व रोग व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीने कसे करावे, यावर विनोद माढेकर यांनी मार्गदर्शन केले.
डी. वाय. पाटील फार्म, तळसंदे येथे प्रत्यक्ष प्रात्यक्षिके घेण्यात आली. डॉ. निनाद वाघ व प्रगतीशील शेतकरी विकास तारे यांच्या मार्गदर्शनाखाली दशपर्णी अर्क, जीवामृत, बिजामृत आदी सेंद्रिय निविष्ठा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष तयार करून दाखविण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पन्हाळा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा, कोल्हापूर आर. एस. चौगुले, विश्वजीत पाटील तसेच शाहूवाडी तालुक्याचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन कांबळे यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील व विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
——————————
सेंद्रिय शेतीतून जमिनीचे आरोग्य व उत्पादनवाढ शक्य : रविंद्र तागड
RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
29.8
°
C
29.8
°
29.8
°
74 %
3.9kmh
58 %
Sat
30
°
Sun
31
°
Mon
30
°
Tue
29
°
Wed
29
°

