Homeशैक्षणिक - उद्योग शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी शस्त्र : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी शस्त्र : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

• संजय घोडावत विद्यापीठाचा ७वा दीक्षांत समारंभ उत्साहात
कोल्हापूर :
शिक्षणाचा उद्देश केवळ पदवी मिळवणे नाही, तर उत्तम नागरिक घडवणे आहे. मूल्याधिष्ठित शिक्षण आणि शिस्तीच्या आधारेच समाजात स्थैर्य, समता आणि सौहार्द निर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. यावेळी आपल्या प्रभावी भाषणात रामनाथ कोविंद यांनी विद्यार्थ्यांना मूलभूत जीवनमूल्यांची जाणीव करून देत राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभागाचे आवाहन केले. ते संजय घोडावत विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
ज्ञान, शिस्त आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची पताका उंचावत संजय घोडावत विद्यापीठाचा ७वा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या भव्य प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यास भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून, तर प्रख्यात नेत्रतज्ज्ञ व राज्यसभेचे माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे हे विशिष्ट अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
या समारंभात विविध शाखांतील एकूण ९३७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. त्यापैकी ९२१ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी, तर १६ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी देण्यात आली. इंजिनिअरिंग, फार्मसी, डिझाईन, मीडिया, सायन्स, मॅनेजमेंट, आर्ट्स, फूड टेक्नॉलॉजी आणि मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी या शाखांतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करून गौरविण्यात आले.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, यशासाठी सुदृढ शरीर, सुदृढ मन आणि सातत्याने शिकत राहण्याची वृत्ती आवश्यक आहे. शिक्षण ही आजीवन प्रक्रिया आहे. जीवनातील प्रत्येक अनुभवातून शिकणे हेच खरे शिक्षण आहे. यावेळी त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाजकल्याण कार्याचा उल्लेख करत सांगितले की, शाहू महाराजांनी वंचित घटकांना शिक्षणाद्वारे संधी दिली. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत प्रत्येक तरुणाने समाजात समतेचा भाव रुजवावा. शिक्षण हीच खरी सामाजिक क्रांती आहे.
समारोपात त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्मितीत सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले. तुम्ही थेट किंवा अप्रत्यक्षपणे देशाच्या विकासात योगदान देणार आहात. हेच तुमच्या जीवनाला खरे समाधान देईल, असे ते म्हणाले.
या समारंभात विद्यापीठाच्या विविध शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांना माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्या हस्ते सुवर्णपदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी विद्यार्थ्यांना व्हिजिनियर राहून आपला गोल साध्य करण्यासाठी समाजातील सर्व घटकांची नाळ जोडून  पीडीएफ पर्पज, डिसिप्लिन, फिटनेस हे प्रामुख्याने कर्तव्य करावेत आणि इबीसी एक्सक्युज, ब्लेम, कंप्लेंट हे जीवनात कधीच करू नये असे बोलून शेवटी त्यांनी सर्व पदवीधर विद्यार्थ्यांना राष्ट्रहिताचे कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले. शिक्षणाचा उपयोग केवळ करिअरसाठीच नव्हे, तर समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी करा. भारताला पुढे नेणारे सक्षम, सजग आणि सशक्त नागरिक व्हा, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले आहे.
या दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ. उद्धव भोसले यांनी स्वागत करून विद्यापीठाचा वार्षिक अहवाल  सादर केला. यावेळी विद्यापीठाची गव्हर्निंग बॉडीचे सर्व सदस्य, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमिटीचे सर्व सदस्य, घोडावत फॅमिलीतील सदस्य उपस्थित होते. या भव्य सोहळ्याच्या आयोजनात विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, परीक्षा नियंत्रक डॉ. एन. के. पाटील, विद्यापीठाचा सर्व स्टाफ यांचे मोलाचे योगदान लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.8 ° C
28.8 °
28.8 °
76 %
8kmh
99 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page