कोल्हापूर :
संपूर्ण जगासाठीच सूर्य हा मोफत ऊर्जेचा कधीही न संपणारा अखंड नैसार्गिक स्त्रोत आहे. याचा पुरेपूर वापर करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली “पी. एम. सूर्यघर योजना” संपूर्ण जिल्ह्याभर घरोघरी राबविण्याचा निर्धार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात सोमवारी श्री. मुश्रीफ यांच्या उपस्थितीत विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, या योजनेमुळे सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून निर्माण झालेली वीज संबंधिताला मोफत मिळेल.अनुदान वजा जाता सुरुवातीची तीन वर्षे साधारणता दरमहा वीज बिला एवढाच हप्ता बसेल. त्यानंतर दरमहा येणारे वीज बिल शून्य होईल. पर्यायाने,पर्यावरणाच्या संरक्षणालाही हातभार लागेल.
पी. एम. सूर्यघर योजनेच्या आढाव्यानंतर मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्त्यांचा आढावा घेताना श्री मुश्रीफ म्हणाले, शेतकऱ्यांना शेताकडे ये- जा करण्यासाठी, वैरण व गोठ्यांमधून दूध आणण्यासाठी, बी-बियाणे व खतांच्या वाहतुकीसह काढणी केलेली पिके वाहनांमधून घर व विक्रीसाठी नेण्याकरिता तसेच वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांसह विशेषत: माता-भगिनी व शाळेला ये जा करणाऱ्या बालकांसाठी पाणंद रस्ते म्हणजे जणू जीवनमार्गच आहेत.
ज्या-ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे वाद नसतील म्हणजेच पर्यायाने त्यांची संमती असेल अशा सर्व ठिकाणी प्रशासनाच्या सहाय्याने पाणंद रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येणार आहेत. या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात सोय होणार असल्याने शेतकऱ्यांनी आप-आपसातील वाद मिटवून या योजनेचा वापर प्रभावीपणे करावा. या अभियानाचा प्रारंभ येत्या १९ एप्रिलपासून कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा आदी मतदारसंघातून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करणार असल्याचे श्री. मुश्रीफ म्हणाले. तसेच दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढून संबंधितांना न्याय द्यावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
तर पाणंद रस्त्याबाबत येथे ८ दिवसांमध्ये दर निश्चिती केली जाईल. तसेच ग्रामपंचायतीकडून या रस्त्याच्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रस्ताव मागविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी दिली.
या आढावा बैठकीसाठी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी श्रीमती वर्षा शिंगण, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, महावितरण अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, रोहयो व उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश पवार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पी. एम. सूर्यघर योजना संपूर्ण जिल्हाभर राबविणार : मंत्री हसन मुश्रीफ
Mumbai
haze
34
°
C
34
°
33.9
°
62 %
6.2kmh
40 %
Mon
33
°
Tue
31
°
Wed
31
°
Thu
31
°
Fri
31
°

