Homeशैक्षणिक - उद्योग रिलायन्स फाउंडेशन देशभरात १० लाख ‘सायबर सखी’ घडवणार

रिलायन्स फाउंडेशन देशभरात १० लाख ‘सायबर सखी’ घडवणार

कोल्हापूर :
रिलायन्स फाउंडेशनने ग्रामीण महिलांना डिजिटल जगात सुरक्षित बनवण्याच्या उद्देशाने ‘e-SafeHER’ कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. हा सायबर सुरक्षा जनजागृती आणि प्रशिक्षण उपक्रम असून, भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत C-DAC (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग) या संस्थेच्या सहकार्याने तो राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचा उद्देश पुढील तीन वर्षांत देशभरातील १० लाख महिलांना ‘सायबर सखी’ म्हणून तयार करणे हा आहे, ज्यामुळे त्या सुरक्षित आणि आत्मविश्वासाने डिजिटल सेवांचा वापर करू शकतील. या उपक्रमाची सुरुवात मध्य प्रदेश आणि ओडिशा येथे होणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशभर विस्तार करण्यात येईल.
e-SafeHER अंतर्गत महिलांना सायबर सुरक्षेबाबत जागरूक आणि सक्षम करण्यासाठी ग्रामीण भागात ऑनलाइन सुरक्षा, डिजिटल व्यवहार आणि इंटरनेटचा सुरक्षित वापर याबाबत प्रशिक्षण दिले जाईल. हा उपक्रम विशेषतः त्या महिलांवर लक्ष केंद्रित करतो आहे, ज्या झपाट्याने डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडल्या जात आहेत. रिलायन्स फाउंडेशन हा कार्यक्रम देशभरात स्वयं-साहाय्य गट (Self Help Groups) आणि आपल्या स्थानिक नेटवर्कच्या माध्यमातून राबवणार आहे, तर C-DAC प्रशिक्षण साहित्य आणि तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देणार आहे.
यावेळी रिलायन्स फाउंडेशनच्या संचालक ईशा अंबानी म्हणाल्या की, भारतामध्ये ग्रामीण महिला पूर्वीपेक्षा अधिक वेगाने ऑनलाइन येत आहेत. रिलायन्स फाउंडेशनचा उद्देश केवळ डिजिटल प्रवेश वाढवणे नसून, त्यांना सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक माहिती आणि कौशल्य प्रदान करणे आहे. e-SafeHER च्या माध्यमातून आम्ही महिलांना डिजिटल जगाचा आत्मविश्वासाने वापर कसा करावा आणि त्यांच्या जीवनमान व उपजीविकेला कसे बळकटी द्यावी हे शिकवू इच्छितो.
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन म्हणाले की, देशातील सायबर सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही e-SafeHER सारख्या उपक्रमांद्वारे दुर्गम ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचत आहोत, जेणेकरून त्या डिजिटल जगात सुरक्षित आणि सशक्त बनतील. हा एक असा मॉडेल आहे, जो मोठ्या प्रमाणावर पुढे स्वीकारता आणि विस्तारता येऊ शकतो.
रिलायन्स फाउंडेशनच्या मते, हा उपक्रम महिलांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी चालविल्या जाणाऱ्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. याअंतर्गत डिजिटल साक्षरता, रोजगार, आरोग्य आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांत कार्य केले जात आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.4 ° C
28.4 °
28.4 °
82 %
8.3kmh
100 %
Thu
29 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page