Homeशैक्षणिक - उद्योग नैसर्गिक शेतीत महिलांचे योगदान महत्वाचे : पोपट पाटील

नैसर्गिक शेतीत महिलांचे योगदान महत्वाचे : पोपट पाटील

• कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे येथे नैसर्गिक शेती प्रशिक्षण
कोल्हापूर :
नैसर्गिक शेतीत महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन व पर्यावरणपूरक शेतीची संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत महिलांसाठी नैसर्गिक शेतीवरील पाच दिवसीय ‘सखी प्रशिक्षण कार्यक्रमा’च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
भारतीय कृषी अनुसंधान संस्थान, नवी दिल्ली संलग्न डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने  राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत ‘सखी प्रशिक्षण कार्यक्रम’ झाला. या प्रशिक्षणात कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांना नैसर्गिक शेतीविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
पोपट पाटील यांनी कृषी विभाग व आत्मामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच नैसर्गिक शेतीची आवश्यकता व महिलांचा सहभाग याबाबत मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाचे फलित म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या ६० कृषी सखी आपापल्या गावात जाऊन इतर शेतकरी महिलांना नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्यासाठी ‘प्रशिक्षक’ म्हणून काम पाहणार आहेत.
प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख जयवंत जगताप यांनी केले. त्यांनी केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. नैसर्गिक शेती प्रयोगशाळा, उत्पादन युनिट्स, प्रात्यक्षिक शेत आणि प्रशिक्षण व्यवस्थेचे महत्व अधोरेखित केले.
प्रशिक्षणादरम्यान नैसर्गिक शेतीचे तत्त्वज्ञान, सिद्धांत व पारंपरिक ज्ञानाचे महत्त्व, बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत तयार करण्याची प्रक्रिया व फायदे, सेंद्रिय खत व्यवस्थापन, वर्मी कंपोस्टिंग व खतांचे साठवण व वापर, कीड नियंत्रणासाठी नैसर्गिक उपाय, आंतरपिक व मिश्रपीक पद्धती, महिलांसाठी पूरक व्यवसाय, मूल्यवर्धन प्रक्रिया याबाबत माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्येक दिवशी विषयतज्ज्ञ मार्गदर्शकांच्या सत्रांद्वारे व्याख्याने, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, चर्चा व गट कार्यशाळा संपन्न झाल्या.
या कार्यक्रमात हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी व भुदरगड तालुक्यांतील  ६० कृषी सखी प्रतिनिधी संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी आत्मा कोल्हापूरचे प्रकल्प संचालक जालिंदर पांगरे, उपसंचालक रवींद्र तागड, तसेच पन्हाळा बीटीएम आर. एस. चौगुले, हातकणंगले बीटीएम संदीप देसाई, पन्हाळा एटीएम विश्वजीत पाटील, शाहूवाडी एटीएम सचिन कांबळे, हातकणंगले एटीएम वसीम मुल्ला, शिरोळ एटीएम कीर्तीकुमार पाटील यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विस्तार विशेषज्ञ राजवर्धन सावंत भोसले व आभार दीपक पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
mist
28 ° C
28 °
28 °
78 %
3.1kmh
20 %
Wed
31 °
Thu
30 °
Fri
31 °
Sat
32 °
Sun
32 °

Most Popular

You cannot copy content of this page