Homeराजकियकौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी जीवाचे रान करू : श्रीराम साळुंखे

कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी जीवाचे रान करू : श्रीराम साळुंखे

• विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदार नोंदणी सहविचार सभेत शिक्षकांचा निर्धार
कोल्हापूर :
महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविण्यामध्ये महाराष्ट्राचे नररत्न, द्रष्टे समाजचिंतक, ध्येयनिष्ठ शिक्षक, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. बापूजींच्या विचारांचा वसा आणि वारसा लाभलेल्या कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेत शिक्षक आमदार म्हणून विजयी करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू, असे प्रतिपादन कोल्हापूर विभागप्रमुख श्रीराम साळुंखे यांनी केले.
ते पुणे विभाग शिक्षक मतदार नोंदणीसाठी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे आयोजित केलेल्या शिक्षकांच्या सहविचार सभेत बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे होते.
श्रीराम साळुंखे पुढे म्हणाले की, विकसित समाजनिर्मितीमध्ये शिक्षकांची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे शिक्षकांच्या सर्वांगीण प्रश्नांची जाण असणारा आपला हक्काचा माणूस विधानपरिषदेवर पाठविण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी प्रत्येक गुरुदेव कार्यकर्त्याने, शिक्षकाने प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने आतापर्यंत तीनवेळा शिक्षक आमदार निवडून दिले आहेत. आजच्या बदलत्या शिक्षण प्रवाहात शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारा शिक्षक आमदार विधान परिषदेत पाठविणे गरजेचे आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा अंगीकार करून कौस्तुभ गावडे यांची जडणघडण सुरू आहे. त्यामुळे ६ नोव्हेंबर, २०२५ पर्यंत शिक्षक मतदार नोंदणी सुरू असून या काळात जास्तीत जास्त शिक्षक मतदार नोंदणी करावी आणि कौस्तुभ गावडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करावे, असे मत मांडले.
याप्रसंगी पुणे विभाग शिक्षक मतदार नोंदणीचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख भूपाल कुंभार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या एकूण शिक्षक मतदार नोंदणीचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले.
पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी जुनी पेन्शन योजना, संचमान्यता, टप्पा अनुदान, पवित्र प्रणाली, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्ती आणि वेतनेत्तर अनुदान यासारख्या विषयावर शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे आश्वासन दिले.
यावेळी सभेस कोल्हापूर जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजी- माजी पदाधिकारी, आजीव सेवक, हितचिंतक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक मतदार नोंदणी जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, बुथप्रमुख, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.8 ° C
28.8 °
28.8 °
77 %
7.5kmh
96 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page