Homeसामाजिकप्राधिकरणाने सर्वार्थाने नियोजनबद्ध विकासासाठी काम करावे : पालकमंत्री

प्राधिकरणाने सर्वार्थाने नियोजनबद्ध विकासासाठी काम करावे : पालकमंत्री

कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या बैठकीत सूचना
कोल्हापूर :
नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण हे शहराच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासासाठी कार्य करणारी एक प्रमुख शासकीय संस्था आहे. या प्राधिकरणाने सर्वार्थाने नियोजनबद्ध विकासासाठी काम करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात प्राधिकरणाची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दि. आ. कदम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, शहरातील लोकसंख्या वाढ, औद्योगिकीकरण आणि नागरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेकडून कोल्हापूरचा विकास आराखडा तयार करून त्यानुसार पायाभूत सुविधा उभारणे अपेक्षित आहे. रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, सार्वजनिक स्थळे, हरित क्षेत्र, तसेच गृहनिर्माण यांसारख्या महत्त्वाच्या सुविधा पुरविण्याचे काम हे प्राधिकरण करते. अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवणे, पर्यावरण संवर्धन करणे आणि शहराचे सौंदर्य वाढविणे हीदेखील याची जबाबदारी असते. त्यांनी यावेळी प्राधिकरणातील सदस्य यांच्या नावाचे फलक लावण्याचे निर्देश दिले. यामुळे अडचणी घेऊन लोक त्यांना भेटतील व कामकाज सुरळीत होईल असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ४२ ए नुसार कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील ३७ गावे आणि हातकलंगले तालुक्यातील पाच गावे याप्रमाणे एकूण ४२ गावांसाठी कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र घोषित करून कलम ४२ सी प्रमाणे शासनाने नगर विकास विभागाकडील अधिसूचनेनुसार कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण गठीत केले आहे. या प्राधिकरण कामकाजाचे स्वरूप ठरवण्यासाठी, प्रस्तावित विकासाची रूपरेषा तयार करणे संदर्भात अध्यक्ष तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती.
नागरिकांच्या सहभागातून शहराचे नियोजनबद्ध आणि संतुलित विकास साधण्याचे कार्य प्राधिकरणामार्फत व्हावे. फक्त बांधकामास परवानगी देणे त्यांचे काम नसून त्यांनी शहराचा चौफेर विकास साधण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवणे अपेक्षित आहे असे पालकमंत्री यांनी या बैठकीत सांगितले.

RELATED ARTICLES
Mumbai
haze
31 ° C
31 °
31 °
66 %
5.7kmh
40 %
Tue
31 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
30 °
Sat
30 °

Most Popular

You cannot copy content of this page