Homeसामाजिकपन्हाळा किल्ला जगाच्या नकाशावर : जिल्हाधिकारी

पन्हाळा किल्ला जगाच्या नकाशावर : जिल्हाधिकारी

• युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत पन्हाळा किल्ल्याची नोंद
कोल्हापूर :
छत्रपती शिवरायांच्या अलौकिक इतिहासाची साक्ष देणाऱ्या पन्हाळा किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. यात पन्हाळ्यासह राज्यातील ११ किल्ले व तामिळनाडूतील एक अशा १२ किल्ल्यांचा समावेश आहे, असे सांगून जगभरातील पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी आणि गडाचे वैभव सर्वदूर पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांनी सहकार्य व पाठपुरावा केला आहे. तसेच पन्हाळा येथील स्थानिक नागरिकांनी या कालावधीत पूर्ण योगदान दिल्यामुळे हे शक्य झाले, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
जागतिक वारसास्थळांच्या यादीत पन्हाळा किल्ल्याचा समावेश झाल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पन्हाळा किल्ल्यावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. तसेच शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशिद यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. लेझीम व पथकासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. प्रमुख उपस्थित होते. तसेच उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, मुख्याधिकारी चेतन कुमार माळी, माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी, अधिकारी, कर्मचारी व पन्हाळ्यावरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये पन्हाळा किल्ल्याचे नाव समाविष्ट झाल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशासन व स्थानिक नागरिकांचे अभिनंदन करुन आता पन्हाळा व कोल्हापूरकरांची जबाबदारी वाढली असल्याचे प्रतिपादन केले.
जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मूल्यांकनासाठी ‘युनेस्को’च्या शिष्टमंडळाने पन्हाळा किल्ल्याची पाहणी केली होती. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय), महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या अधिकार्‍यांसह ‘युनेस्को’च्या पथकाने किल्ल्याची सखोल पाहणी  करुन माहिती घेतली असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री येडगे यांनी दिली.
भारतातील मराठा लष्करी भूप्रदेशासाठी जागतिक वारसा नामांकनाचा प्रस्ताव राज्य शासनाच्यावतीने ‘युनेस्को’ला पाठवण्यात आला होता. छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणार्‍या राज्यातील पन्हाळा, रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडू राज्यातील जिंजी अशा १२ किल्ल्यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27 ° C
27 °
27 °
81 %
5kmh
100 %
Sat
27 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page